Sunday, May 20, 2012
Text Size
Administrator

Administrator

देवगडकरांकडुन पाठवलेला हापूस आंबा खाल्यानंतर पुलंनी त्यांचे आभार एका पत्रातून व्यक्त केले होते हेच ते पत्र.

मुळ स्त्रोत - http://devgadmango.com/blog/?p=122

Wednesday, 20 April 2011 21:25

भाईकाका

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांनी आपले भाचे दिनेश ठाकूर तथा दिनूवर 'गणगोत' या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात एक नितांतसुंदर लेख लिहिला आहे. १९ मे १९६६ रोजी दिनूला हे पुस्तक भेट देताना त्यांनी लिहीलं होतं...त्यास स्मरुन अमेरिकास्थित दिनेश ठाकूर यांनी आपल्या भाईकाकांवर हा ह्र्दयस्पर्शी लेख...

भाईकाका जाऊन आता आठ वर्षे होतील. पण त्यांच्या आठवणींची, नावाची नशा काही उतरत नाही. आजही भाईकाकांची पुस्तके वाचताना, टेप्स ऎकताना ते माझ्याशीच बोलताहेत, संवाद साधत आहेत, असे वाटत राहते. आणि कुठच्याही प्रसंगी त्या संदर्भातले भाईकाकांचे प्रसन्न व्हायला होते.... आठवणीत रंगून जायला होते. हिच स्थिती भाईकाकांचा सहवास लाभलेल्या अनेकांची आहे. नवल म्हणजे भाईकाका गेले तेव्हा आशुतोष आठ-साडेआठ वर्षाचाच होता, पण त्याचीही तीच स्थिती आहे. शाळेतून घरी आल्यावर किंवा शनिवार-रविवारी 'असा मी..', 'बटाट्याची चाळ' , 'वाऱ्यावरची वरात' , 'बोरकर कवितावाचन'ची कायम पारायणे चाललेली असतात.

'गणगोत'च्या मला दिलेल्या प्रतीवर भाईकाकांनी लिहिले आहे... 'चि. दिनेशला - आशीर्वादपूर्वक भेट. या पुस्तकात मी तुझ्यावर एक लेख लिहीला आहे. तू मोठा झालास की माझ्यावर एक लेख लिही . - तुझा भाईकाका.' या गोष्टीची सतत आठवण व्हायची. पण कधी लिहावे म्हटले की, 'आतले न मना गवसे..मनातले न ये मुखी... मुखातुन बोलताना, भाषा त्यालाही पारखी, जाणिवेच्या व्यापाराला अशी उतरती कळा' हेच जाणवत राही. नेमक्या शब्दांत भावना व्यक्त करणे भाईकाकांसारख्या किंवा विंदा करंदीकरांसारख्या फार थोड्यांनाच जमते. म्हणून त्यांच्या पंच्याहत्तरिला गणिताच्या संशोधनाच्या एक पेपर व नंतर मी लिहिलेले गणितावरचे पुस्तक 'वनवेलींनी काय वाहणे याहून कल्पद्रुमा' या भावनेने त्यांना अर्पण करुन थांबलो होतो. माईआतेने लिहीले आहे. खूप मोठ्या मोठ्या लोंकानी छान आठवणी सांगितल्या आहेत. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला अप्रतिम भाषण केले होते. जब्बार पटेल व मुक्ता राजाध्यक्ष यांनी केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये व इतर अनेक उपलब्ध भाषणांत तर भाईकाका स्वत:च बोलले आहेत. तेव्हा मी आणखी काय लिहायचे? पण तु लिहिलेस तर माईआतेला बरे वाटेल, असा आग्रह झाला तेव्हा काही आठवणी लिहायला घेतल्या.

वरळीला 'आर्शीवाद'मध्ये भाईकाका, आम्ही व माझी-मामी एकाच मजल्यावर शेजारी-शेजारी राहायचो. (भाईकाका त्या घराला 'नणंदादिप' म्हणत.) नंतरही सांताक्रुझला 'मुक्तांगण', पुण्याला 'रुपाली' , 'मालती-माधव' ही माझीही घरंच होती. लहान-मोठी सुट्टी पडली रे पडली, की मी तिथे निघायचो, घरचे आणि शालूआते चिडवायची 'निघाला माहेराला' म्हणून ! 'रुपाली'त खूप वेळ जायचा- भाईकाकांच्या मोठ्या कॉटवर लोळत, गप्पा करीत व टेप्स किंवा रेडिओवर गाणी ऎकत. रात्री भाईकाका नॅशनल प्रोग्रॅम किंवा पाकिस्तान रेडिओवर कव्वाली, गझल ऎकायचे. भाईकाका खरे फुलायचे ते गप्पागोष्टी, गाण्यांच्या मैफलीत. पुण्याला अनेक दिवस-रात्री असे जायचे की, वसंतराव देशापांडे यांना गॅलरीतून हात केला की ते यायचे, नारळकारकाका यायचे. मग गप्पा, चेष्टामस्करी, कोट्या, गाणी आणि नकलांमध्ये रात्र सरायची. आनंदाला उधाण यायचे. भाईकाका आणि वसंतराव ऎकमेकांना खुलवत राहत आणि बैठकीत रंग चढत जाई. अशी कितीतरी वर्षे गेली. माझ्यासाठी खरोखरच ते मंतरलेले दिवस होते. ती झिंग पुढे अनेक दिवस टिकायची. अजूनही ती उतरायला तयार नाही.

'रुपाली'त अनेक लोकांचा राबता असे. कधी कुमारकाका येत. मन्सूर अण्णा राहायला आले की के.डी. दिक्षित, वसंतराव, नारळकाका हमखास असत. कालेलकरकाका, अ. भि. शहा, गोविंदराव तळवळकर, महादेव जोशी, तर्कतिर्थ लक्षमणशास्त्री जोशी, जब्बार पटेल, शांताबाई शेळके, राम पुजारी, राम गबाले, आप्पा जाधव अशा नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व इतर मातब्बर मंडळींच्या सहभागाने मैफली रंगायच्या. कधी कधी नवोदित तरुण कलाकार हजेरी लावून जात.

भाईकाकांचे एकूणच माणसांवर प्रेम होते. कुणात थोडा काही गुण असला, रसिकता असली, की त्यांच्या गप्पा चालू. जणू काही तो त्यांच्या लेखन, मनन, भाषणासाठीचा रियाज असे. त्यांची विलक्षण संदर्भसंपन्नता व हजरजबाबीपणा त्यांच्या भाषणांप्रमाणेच या गप्पांतही जाणवायचा. भाईकाकांच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांशी सहज गप्पा चालू असताना माईआतेने भाष्य अगदी समर्पक होते... 'भाई, तुऊ शिवाजी असतास आणि अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त भरपूर गप्पा रंगवून परत आला असतास.' एकदा आम्ही सासवडला पुरंदऱ्यांकडे राहायला गेलो व मग बाबासाहेबांबरोबर पुरंदर गड पाहायला गेलो. तेव्हा महारजांचा गड पाहायला जाण्याऎवजी पायथ्यालाच डेरे टाकून भाईकाकांनी ज्या काही गप्पा रंगवल्या, की सर्वजण गड विसरले. शेवटी बाबासाहेबांबरोबर गड बघायला मिळणार, या आशेने आलेला माझा चुलतभाऊ उमेश अस्वस्थ होऊन चुळबुळ करु लागला. तेव्हा भाईकाका त्याला म्हणाले, 'अरे, तू गडाला एक असा फेरफटका मारुन ये.' शेवटी बाबासाहेबांनाच दया येऊन त्यांनी उमेशला फिरवून आणले.

भाईकाका व माईआतेबरोबर मला खूप फिरायला मिळाले. ५ वी- ६ वीच्या सुट्टीत आई-वडिलांबरोबर काश्मिरला न जाता मी भाईकाकांबरोबर बेळगाव, धारवाड, बंगलोर फिरलो. त्यावेळी भाईकाका संगीत नाटक ऍकॅडमीत होते. रोज म्युझीक, ड्रामा, डान्स फेस्टीव्हल्स चालत. बाकी वेळ कलाकारांबरोबर गप्पा. अजूनही त्यावेळची रघूरामय्यांची 'बाबुजी' ही हाक, त्यांची भाईकाकांवरची भक्ती व त्यांनी गायलेली बालगंधर्वाची गाणी डोक्यात आहेत. त्याच ट्रिपमध्ये मन्सुर अण्णांचा झालेला सत्कार, वसंतरावांचे गाणे, कविवर्य बेंद्रे यांची झालेली भेट, मन्सुर अण्णांच्या घरी कुठल्यातरी 'कानडा' प्रकावरुन झालेला गवयांचा जोरदार वाद... अशाही अनेक आठवणी ताज्या आहेत.

इचलकरंजीच्या साहीत्य संमेलनानंतर लवकरच वसंतराव आचरेकरांबरोबर आचऱ्याला रामनवमीला भाईकाकांचे शेपूट म्हणून मला चार दिवस जाता आले. ते दिवसही अविस्मरणीयच. कुमारकाका, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते, बंडूभैया चौगुले, मुरलीधर आचरेकर, गोंविदराव, अशोक रानडे, रत्नाकर व्यास, कारेकर अशा सगळ्या मातब्बर मंडळींना एक मोठा गोठा साफ करुन उतरवले होते. दिव्सभर गप्पा, गाणी आणि नकला. गोविंदराव आणि भाईकाकांची पेटीची जुगलबंदी. कुमारकाकांचा संध्याकाळचा अप्रतिम पुरिया धनश्री, कल्याणमधली 'मुख तेरो कारो' (त्याच्यावरचे ते गोठ्यातले निरुपण आणि उजळणी), पुन्हा दुसऱ्याच दिवशी सकाळी रंगलेला शुद्ध सारगं, गौड सारंग, वसुंधराकाकींचे 'पतियान भेजो रामा,' अशोक रानडे यांचे रंगलेले गाणे, कुमारकाकांच्या देवळ्यातल्या गाण्याचे मुरलीधर आचरेकरांनी काढलेले अप्रतिम हुबेहुब चित्र आणि चिंचाळकर गुरुजींनी काढलेले दोन-तीन रेघोट्य़ांचे अप्रतिम, पण अमूर्त चित्र. शाकाहारी पंगतीत वसंतराव आचरेकरांनी भाईकाकांना व आम्हा काही मंडळीना गुपचुप पुरवलेले खास मासे... मला त्यावेळेपासून पडलेले- आचरेकरांनी ठेवलेल 'भाचे' हे नाव... एकदा भाईकाकांच्या गैरहजरीत त्यांच्या रसिकतेविषयी आणि गाण्याच्या मर्मज्ञानाविषयी कुमारकाका, गुरुजी आणि राहुलजी यांनी भाईकाकांचे कौतुक... अश्या असंख्य आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत.

पुढे वाचा

१) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

२) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' .

३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा मित्र शरद तळवलकर" "हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"

४) पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद " मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ."

५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.
त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती. शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही." तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, "पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.

६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार". ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. "तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"

७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"

१०) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"

१२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'

१३) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'

१४) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.

१५) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.

१६) 'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.

१७) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!

१८) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"

१९) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

२०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली " अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?" त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"

२१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"? पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता !

२२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

२३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

२४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"

२५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."

पुढे वाचा

Saturday, 16 April 2011 07:12

तारक मंत्र


॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥
॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥
॥ श्री गुरुदत्तात्रेयाय - स्वामी समर्थाय नमो नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
स्वामी समर्थ महाराज की जय

हे मना रे, निर्भय हो । निःसंशयी हो ।
असे पाठीशी रे । प्रचंड स्वामी बळ हे ।
स्मृतगामी अतकर्य । अवधूत हे ।
अशक्य ते शक्य । करतील स्वामी हे ॥१॥
जेथे स्वामी चरण । असे उणे काय तेथे ।
भक्त प्रारब्ध । स्वये घडवी ही प्राय ।
न नेई तयाला । आज्ञेविण काळ ।
नसे भिती ही । परलोकी ही तयाला ॥२॥
भय हे पळेल । घेताच नाम स्वामींचे ।
आहे जवळी ही उभी । स्वामीच शक्ती रे ।
जन्म मृत्यू हा खेळ । असे जगी ज्यांचा ॥३॥
श्रद्धा ठेव रे । स्वामी मंत्रावरी ।
त्या विणा कसारे । होशील त्यांचा भक्त ।
देतात आपणा । सदैव तेच हात ।
देतील स्वामीच साथ । नको उगा घाबरु ॥४॥
घे हेच स्वामी तीर्थ । होय भयभय मुक्त ।
आहेत स्वामीच । या नाशीवंत देहात ॥
आठवी रे प्रचिती । घेऊनी या हे तीर्थ ।
न वंचिती तूला हे । स्वामी समर्थ ॥५॥
अनन्याश्चिंतयन्तो मां येजनः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तनां योगक्षेम वहाम्यहं ।
श्री स्वामी चरणारविदार्पणमस्तु ॥६॥

'' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ''

Saturday, 16 April 2011 06:44

साने गुरुजी

साने गुरुजी

महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक !


साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने ! त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे  धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’

त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.  ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने  त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

‘बलसागर भारत होवो। विश्र्वात शोभूनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।’

या काव्यपंक्तींनी त्या काळात प्रेरणा निर्माण केली होती. आजही ही कविता तेवढीच परिणामकारक आहे.

समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते.ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. आजही त्यांच्या कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. साने गुरुजींनी स्फुर्तिदायी कविता लिहिल्या, ‘श्यामची आई’ सारखी सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिली;  त्यांनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली होती. ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टही करत होते. पण त्यांचे आदर्श विचार, त्यांच्या कल्पनेतील भारत यांच्या विपरीत अनुभव त्यांना येऊ लागले. त्यांच्या संवेदनशील मनाला हा विरोधाभास सहन झाला नाही. मनाच्या हताश अवस्थेतच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.
Sunday, 10 April 2011 12:32

कर्म योग

अर्जुन म्हणाला -

हे जनार्दना ! जर तुम्हांला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा ! मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात ? ॥१॥

तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की, ज्यामुळे माझे कल्याण होईल. ॥२॥

श्रीभगवान म्हणाले -

हे निष्पापा ! या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. ॥३॥

मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगानिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. ॥४॥

निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासुन उत्पन्न झालेल्या गुणांमुळें पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. ॥५॥

जो मूर्ख मनुष्य सर्व इन्द्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंन्द्रियांच्या विषयांचे चिन्तन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. ॥६॥

परन्तु हे अर्जुना ! जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. ॥७॥

तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. ॥८॥

यज्ञानिमित्त केल्या जाणार्‍या कर्माशिवाय दुसर्‍या कर्मांत गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मानी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना ! तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. ॥९॥

प्रजापति ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उप्तन्न करुन त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. ॥१०॥

तुम्ही या यज्ञाने देवतांची पृष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हांला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. ॥११॥

यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हांला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रितीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो, तो चोरच होय ॥१२॥

यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासुन मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर - पोषणासाठी अन्न शिजवतात, ते तर पापच खातात. ॥१३॥

सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो. ॥१४॥

कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. ॥१५॥

हे पार्था ! जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. ॥१६॥

परन्तु जो मनुष्य आत्म्यताच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतृष्ट असतो, त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. ॥१७॥

त्या महापुरुषाला य विश्वात कर्मे करण्य़ाने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही. ॥१८॥

म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्यकर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. ॥१९॥

जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मानेच परम सिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य. ॥२०॥

श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करातात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. ॥२१॥

हे अर्जूना ! मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्म करीतच असतो. ॥२२॥

कारण हे पार्था ! जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्यीच मार्गाचे अनुसरण करतात. ॥२३॥

म्हणुन जर मी कर्म केले नाही, तर ही सर्व माणसे नष्ट - भष्ट होतील आणी मी संकरतेचे कारण होईन. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. ॥२४॥

हे भारता ! कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्या रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. ॥२५॥

परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व

कर्मे उत्तम प्रकारे करीत त्याच्याकडूनही तशीच करून घ्यावी. ॥२६॥

वास्तविक सर्व कर्में सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अन्तःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष ' मी कर्ता आहे ' असे मानतो. ॥२७॥

पण हे महाबाहो ! गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. ॥२८॥

प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणार्‍या मंदबुद्धीच्या अज्ञान्याचा पूर्ण ज्ञान असणार्‍या ज्ञान्याने बुद्धीभेद करू नये. ॥२९॥

अन्तर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तुं युद्ध कर. ॥३०॥

जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अन्तःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. ॥३१॥

परन्तु, जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मुर्खाचा तुं सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज ॥३२॥

सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील ? ॥३३॥

प्रत्येक इन्द्रियाचे इन्द्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. ॥३४॥

चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्‍याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसर्‍याचा धर्म भय देणारा आहे ॥३५॥

अर्जुन म्हणाला -

हे कृष्णा ! तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो ? ॥३६॥

श्रीभगवान म्हणाले -

रजोगुणापासून उप्तन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण. ॥३७॥

ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धूळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते. ॥३८॥

आणि हे अर्जुना ! कधीही तृप्त न होणार हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रु आहे. त्याने माणसांचे ज्ञान झाकले आहे. ॥३९॥

इन्द्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रीयांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. ॥४०॥

म्हणुन हे अर्जुना ! तू प्रथम इन्द्रियांवर ताबा ठेवून व ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणार्‍या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. ॥४१॥

इन्द्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते, या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे. आणी जो बुद्धीहूनही अत्यन्त पर आहे, तो आत्मा होय. ॥४२॥

अशा प्रकारे बुद्धीहून अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यन्त श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करुन महाबाहो ! तू या कामरूप अजिंक्य शत्रुला मारून टाक. ॥४३॥

Sunday, 10 April 2011 12:30

सांख्य योग

संजय म्हणाला,

अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणार्‍या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥१॥

श्रीभगवान् म्हणाले,

हे अर्जुना ! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला ? कारण हा थोरांनी न आचरिलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥२॥

म्हणून हे पार्था ! षंढपणा पत्करु नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा ! अंत:करणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युध्दाला उभा राहा. ॥३॥

अर्जुन म्हणाला,

हे मधुसूदना ! युध्दात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुध्द बाणांनी कसा लढू ? कारण हे अरिसूदना ! ते दोघेही पूज्य आहेत. ॥४॥

म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारुनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरुप भोगच ना भोगावयाचे ! ॥५॥

युध्द करणे वन करणे या दोहोंपैकी आम्हांला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हांला जिंकतील, हेही आम्हांला माहीत नाही. आणि ज्यांना मारुन आम्हांला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव -धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुध्द उभे आहेत. ॥६॥

करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुध्दी असमर्थ आहे, असा मी तुम्हांला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तु्मचा शिष्य आहे. म्हणून तुम्हांला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥७॥

कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धन-धान्यसमृध्द राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करु शकेल, असा उपाय मला दिसत नाही.

॥८॥

संजय म्हणाला,

हे राजा ! निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अन्तर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून ‘मी युध्द करणार नाही’ असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥९॥

हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज ! अन्तर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणार्‍या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करुन असे म्हणाले. ॥१०॥

श्रीभगवान् म्हणाले,

हे अर्जुना ! तू ज्यांचा शोक करु नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परन्तु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठीही आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, विद्वान माणसे शोक करीत नाहीत. ॥११॥

मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥१२॥

ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उप्तन्न होत नाही. ॥१३॥

हे कुन्तीपुत्रा ! इंद्रियांने विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दु:ख देणारे आहेत. ते उप्तन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ! ते तू सहन कर. ॥१४॥

कारण हे श्रेष्ठ पुरुषा ! सुख-दु:ख समान मानणार्‍या ज्या धीर पुरुषाला इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. ॥१५॥

असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरुप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ॥१६॥

ज्याने हे सर्व जग-दिसणार्‍या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याच्या नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करु शकत नाही. ॥१७॥

या नाशरहित, मोजता न येणार्‍या, नित्यस्वरुप जीवाम्त्याची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना ! तू युध्द कर. ॥१८॥

जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो ‘हा ( आत्मा ) मेला’ असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. ॥१९॥

हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. ॥२०॥

हे पार्था ! जो पुरुष , " हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे, हे जाणतो , तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील ? ॥२१॥

ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो. ॥२२॥

या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ॥२३॥

कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि नि:संशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. ॥२४॥

हा आत्मा अव्यक्त आहे, अचिन्त्य आहे आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. ॥२५॥

परन्तु, जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुध्दा हे महाबाहो ! तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. ॥२६॥

कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. ॥२७॥

हे अर्जुना ! सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असता त आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात. फक्त मध्ये प्रगट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा ? ॥२८॥

एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे

ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. ॥२९॥

हे अर्जुना ! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो . म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. ॥३०॥

तसेच स्वत:चा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरुन असलेल्या युध्दाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥३१॥

हे पार्था ! आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युध्द भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. ॥३२॥

पंरतु जर तू हे धर्मयुक्त युध्द केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. ॥३३॥

तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दु:सह वाटते. ॥३४॥

शिवाय ज्यांचा दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला ‘भिऊन युध्दातून काढता पाय घेतला ’, असे मानतील. ॥३५॥

तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निन्दा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दु:खदायक काय असणार आहे ? ॥३६॥

युध्दात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युध्दात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना ! तू युध्दाचा निश्चय करुन उभा रहा. ॥३७॥

जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुख समान मानून युध्दाला तयार हो. अशा रीतीने युध्द केलेस तर तुला पाप नाही लागणार. ॥३८॥

हे पार्था ! हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुध्दीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. ॥३९॥

या कर्मयोगात आरंभाचा अर्थात् बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरुप दोषही नाही. इतकेच नव्हे तर, या कर्मयोगरुप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरुप मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥४०॥

हे अर्जुना ! या कर्मयोगात निश्चयात्मक बुध्दी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुध्दी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. ॥४१॥

हे अर्जुना, जे भोगांत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणार्‍या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, ॥४२॥

स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरुप कर्मफल देणारी तसेच, ॥४३॥

भोग व ऐश्चर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अन्त:करण आकृष्ट करुन घेतले आहे, जे भोग व ऐश्चर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुध्दी असत नाही. ॥४४॥

हे अर्जुना ! वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दु:खादी द्वंद्वांनी रहित, नित्यवस्तू असणार्‍या परमात्म्यात स्थिर, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अन्त:करणाला ताब्यात ठेवणारा हो. ॥४५॥

सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणार्‍या ब्राह्मणाला वेदांची गरज उरते. ॥४६॥

तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरु नकोस. ॥४७॥

हे धनंजया ! तू आसक्ती सोडून तसेच सिध्दी आणि असिध्दीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे. ॥४८॥

या समत्वरुप बुध्दियोगापेक्षा सकाम कर्म अत्यन्त तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया ! तू समबुध्दीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुध्दियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होत. ॥४९॥

समबुध्दीचा पुरुष पुण्य व पाप या दोहींचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यांपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरुप योगाला चिकटून राहा. हा समत्वरुप योगच कर्मांतील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबन्धनातून सुटण्याचा उपाय आहे. ॥५०॥

कारण समबुध्दीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणार्‍या फळाचा त्याग करुन जन्मरुप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. ॥५१॥

जेव्हा तुझी बुध्दी मोहरुपी चिखलाला पूर्णपणे पार करुन जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह -परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. ॥५२॥

तर्‍हेतर्‍हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुध्दी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्रात्प होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल. ॥५३॥

अर्जुनाने विचारले, हे केशवा ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुध्दी पुरुषाचे लक्षण काय ? तो स्थिरबुध्दी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो ? ॥५४॥

श्रीभगवान म्हणाले-हे अर्जुना ! ज्या वेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ॥५५॥

दु:खदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्रीप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुध्दी म्हटला जातो. ॥५६॥

जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुध्दी स्थित झाली. ॥५७॥

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इन्द्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरुन घेतो, तेव्हा त्याची बुध्दी स्थिर झाली, असे समजावे.

॥५८॥

इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणार्‍या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ॥५९ ॥

हे अर्जुना ! आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ अत्पन्न क रणारी इन्द्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुध्दिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ॥६०॥

म्हणून साधकाने त्या सर्व इन्द्रियांना ताबत ठेवून, चित्त स्थिर करुन, मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इन्द्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुध्दी स्थित होते. ॥६१॥

विषयांचे चिन्तन करणार्‍या पुरुषाची त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. ॥६२॥

रागामुळे अत्यंत मूढता अर्थात् अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुध्दीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुध्दीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अध:पात होतो. ॥६३॥

परन्तु अन्त:करण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष-रहित इन्द्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अन्त:करणाची प्रसन्नता प्रात्प करुन घेतो. ॥६४॥

अन्त:करण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दु:खे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुध्दी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥६५॥

मन आणि इन्द्रिये न जिंकणार्‍या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुध्दी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अन्त:करणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शान्ती मिळत नाही. मग शान्ती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार ? ॥६६॥

कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणार्‍या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणार्‍या इंद्रियांपैकी मन ज्या इन्द्रियाबरोबर राहते, ते एकच इन्द्रिय या अयुक्त पुरुषाची बुध्दी हिरावून घेते. ॥६७॥

म्हणून हे महाबाहो ! ज्याची इन्द्रिये इन्द्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरुन धरलेली असतात, त्याची बुध्दी स्थिर असते. ॥६८॥

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरुप परमानन्दाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणार्‍या मुनीला रात्रीसारखी असते. ॥६९॥

ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुनषामश्ये कोणत्याही प्रकारच विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शान्तीला प्रात्प होतो. भोगांची इच्छा करणरा नव्हे. ॥७०॥

जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करुन, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शान्ती मिळते. ॥७१॥

हे अर्जुना ! ब्रह्माला प्रात्प झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्रात्प झाल्याने योगी कधी मोहित होत नाही. आणि अन्तकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानन्द मिळवतो. ॥७२॥

Sunday, 03 April 2011 09:57

अलिकडील सभासद

Sunday, 03 April 2011 09:55

लोकप्रिय सभासद

Sunday, 03 April 2011 09:52

मराठीजगत कौल

<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
Page 1 of 27